'सिनेसृष्टीत कोणी कोणाचा सगा-सोयरा नसतो', मिलिंद गवळींचे स्पष्ट विधान, म्हणाले 'तुम्हाला मुकाट्याने...'

मिलिंद गवळी यांनी या मालिकेत अनिरुद्ध ही भूमिका साकारली आहे. आता मिलिंद गवळींनी तरुणाईला एक सल्ला दिला आहे. 

नम्रता पाटील | Updated: May 15, 2024, 12:21 PM IST
'सिनेसृष्टीत कोणी कोणाचा सगा-सोयरा नसतो', मिलिंद गवळींचे स्पष्ट विधान, म्हणाले 'तुम्हाला मुकाट्याने...' title=

Milind Gawali Late Night Awakening : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणून आई कुठे काय करतेला ओळखले जाते. या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेले अभिनेते म्हणून मिलिंद गवळींना ओळखले जाते. मिलिंद गवळी यांनी या मालिकेत अनिरुद्ध ही भूमिका साकारली आहे. आता मिलिंद गवळींनी तरुणाईला एक सल्ला दिला आहे. 

मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. मिलिंद गवळी यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी रात्री झोपण्याची वेळ आणि त्याचे होणारे परिणाम याबद्दल भाष्य केले आहे. 

मिलिंद गवळी यांची पोस्ट

सुप्रभात, शुभ सकाळ, सकाळ म्हणजे सूर्योदय व्हायच्या आधीची वेळ, माझ्या सानिध्यात असलेल्या बऱ्याच लोकांची सकाळ दुपारी 12 नंतर होते, “रात्रीच्या शांततेत आम्ही काम करतो, त्यामुळे उशिर होतो झोपायला आणि मग सकाळी लवकर उठायला जमत नाही” हल्लीची पिढी तर रात्री जागरण करतातच करतात, रात्री एक दीड दोन वाजे शिवाय त्यांना झोपच येत नाही किंवा ते झोपतच नाहीत आणि यात आयपीएल मॅचेस वगैरे आहेतच. त्या रात्री अकरा बारा वाजता संपतात, त्यामुळे त्या संपल्यानंतर जेवण वगैरे करून झोपायला उशीर होतो, असं म्हणणारे ही अनेक लोक आहेत. 

माझ्या लहानपणापासून मी एक गोष्ट सतत ऐकत आलोय “लवकर निजे लवकर उठे त्याला यश, आरोग्य, संपत्ती लाभे” Exactly असं नाही पण असंच काहीसं ऐकायला मिळायचं, मी काय आयुष्यात जागरण केलं नाही असं नाहीये. कामानिमित्ताने तर जागरण करावंच लागायचं, बालाजी टेलिफिल्म्सच्या ज्या १० सिरीयल मी केल्या, त्यात जागरण व्हायचं व्हायचं, रात्री खूप उशिरापर्यंत शूटिंग चालायचं, कित्येक वेळा रात्रभर शूटिंग करून पहाटे घरी आलोय मी, मग थोडा वेळ पडायचं आणि परत दुपारच्या शिफ्टला जायचं, Luckily या साडेचार वर्षांमध्ये “आई कुठे काय करते” या मालिकेच्या shooting रात्री उशिरापर्यंत झालेल्या नाहीयेत. 

पण या फिल्म इंडस्ट्रीमध्ये सलग 72 तास, न झोपता काम करणारी माणसं आहेत, खरंतर मलाही रात्रीचं काम करायला मजा यायची, कारण अगदी शांततेत सगळं काम व्हायचं, सगळे झोपलेले असतात, कोणाचे फोन नाही, डिस्टर्बन्स नाही काही नाही, छान काम व्हायचं, पण दुसऱ्या दिवसाची मात्र बँड वाजायची, तसा मी खूप नशीबवान आहे कारण माझी शारदाश्रम विद्यामंदिर शाळा सकाळी सात वाजता सुरू व्हायची, सकाळी सहा वाजता स्कूल बस यायची, आई आंघोळ घालायची,कपडे घालून द्यायची मी मात्र झोपेतच असायचो, पण एकदा का स्कूल बस मध्ये पोहोचलो, शाळेत पोहोचलो की मित्रांबरोबर एकदम फ्रेश होऊन जायचो, दिवसभर दंगा मस्ती,फुल ऑफ एनर्जी आणि रात्री आठ साडेआठला जेवण करून नऊच्या आत झोपून जायचं, मला लवकर झोपायची आणि लवकर उठायची सवय लहानपणापासूनच लागली. आणि ती माझ्यासाठी खूप खूप चांगली गोष्ट झाली.

मग आयुष्यामध्ये कालांतराने लवकर उठण्याचे आणि लवकर झोपण्याचे फायदे मला हळूहळू मिळत गेले. आणि मी अनुभवाने सांगू शकतो की जी मुलं जागरणं करत होती त्यांना पुढे ऍसिडिटीचा त्रास व्हायला लागला, जी मुलं जागरण करायची ती खूप आजारी पडायला लागली comparatively रात्री जागरण न करणाऱ्या मुलांपेक्षा, पहाटे उठणाऱ्या मुलांमध्ये भरपूर energy excitement असायची , आणि रात्री जागरण करणाऱ्या मुलांमध्ये आळसपणा जास्त असायचा lethargic असायची ती मुलं, रात्री जागरण करणारी मुलं चिडचिडी झालेली ही मी पाहिली आहेत.

आता सध्या माझ्या कामाचं स्वरूप असं आहे की कमीत कमी 14 तास तुम्हाला fresh, energetic and alert राहणं अगदी आवश्यक आहे, ती basic गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्हाला सातत्याने चांगलं काम करता येणारच नाही, daily soap आणि television serialचा माझा अनुभव आता बऱ्याच वर्षाचा आहे, या इतक्या वर्षांमध्ये मालिका करत असताना धेपाळलेली आजारी पडलेली किंवा कंटाळलेले अनेक कलाकार मी पाहिलेली आहेत. सुरुवातीला खूप उत्साहाने ते काम करायला येतात आणि हळूहळू त्यांची energy level down होत जाते, बर इथे कोणी कोणाचा सगा-सोयरा नसतो कोणी कोणाचा फार विचार करत बसत नाही, जे काम आहे ते तुम्हाला मुकाट्यानं करावंच लागतं, immune system कमी झालेली असते. आणि त्यामुळे physically शारीरिक दृष्ट्या affect आलेला असतोच पण, यापेक्षाही मानसिक दृष्ट्या खूपसे कलाकार हललेले असतात. 

बरं ते त्यांच्या फार लवकर लक्षात येत नाही, शारीरिक त्रास दिसतो, जाणवतो त्याच्यावर उपाय करणे ही सोपं आहे पण मानसिक दृष्ट्या जर एखादा कलाकार हल्ला तर, त्याच्याही लक्षात यायला खूप वेळ लागतो, and both are interconnected, physical, and mental health, both. आता मी काय यातला expert नाही आहे, पण माझा अनुभवातून कदाचित कुणाला तरी त्यांच्या न सुटलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतील. understanding yourself is important असं मला वाटतं. 

आता मी फार स्वतःची काळजी घेतो अशातला भाग नाहीये, माझ्यापेक्षा खूप पटीने उत्साही energetic लोकं आहेत. मला सूर्योदयाच्या आधी उठायला आवडतं सूर्योदय पाहिला आवडतो, पहाटे उठून योगा प्राणायाम करायला अतिशय आवडतं , तो माझ्या आता सवयीचा भाग झाला आहे, आणि त्याने मला अतिशय फायदा पण झाला आहे, जो अनेक वर्ष झाला नव्हता, मी जितकं काम करू शकायचो त्याच्यापेक्षा आज नक्कीच दुपटीने मी काम करू शकतो तेवढी माझी क्षमता वाढली आहे असं मला वाटतं, पूर्वीपेक्षा जास्त उत्साहाने माझ्यात काम करायची ऊर्जा असते, असे मिलिंद गवळींनी म्हटले आहे. 

दरम्यान सध्या मिलिंद गवळी हे मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीचे अभिनेते आहेत. त्यांनी अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकात काम केले आहे. पण त्यांना आई कुठे काय करते या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. सध्या ते या मालिकेत अनिरुद्ध देशमुख हे पात्र साकारत आहेत.