Playoff Scenario: आरसीबीसाठी प्लेऑफचे दरवाजे अजूनही खुले; पाहा कसं आहे समीकरण

IPL 2024 Playoff Scenario: यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये आरसीबीने आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत. या लीगमध्ये एक टीम 14 सामने खेळणार आहे त्यामुळे आरसीबीच्या टीमला अजून 8 सामने खेळायचे आहेत. 

सुरभि जगदीश | Updated: Apr 13, 2024, 01:53 PM IST
Playoff Scenario: आरसीबीसाठी प्लेऑफचे दरवाजे अजूनही खुले; पाहा कसं आहे समीकरण title=

IPL 2024 Playoff Scenario: आतापर्यंत एकदाही आयपीएलचं जेतेपद न जिंकणारी आरसीबीच्या टीमची सुरुवात 17 व्या सिझनमध्येही काही फारशी चांगली झालेली नाही. सध्याच्या घडीला पॉईंट्स टेबलच्या तळाला असलेल्या रॉयल चॅलेंजर बंगळूरूच्या टीमला आतापर्यंत केवळ एकच सामना जिंकता आला आहे. अशा परिस्थितीत बंगळूरूची टीम 5 सामने गमावून देखील प्लेऑफ गाठणार का असा सवाल आता सर्वांच्या मनात आहे. त्यामुळे आरसीबीच्या टीमसमोर प्लेऑफ गाठण्यासाठी कसं समीकरण असणार आहे, ते पाहूयात. 

आरसीबीला अजूनही प्लेऑफ गाठणं शक्य?

यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये आरसीबीने आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत. या लीगमध्ये एक टीम 14 सामने खेळणार आहे त्यामुळे आरसीबीच्या टीमला अजून 8 सामने खेळायचे आहेत. आतापर्यंत आरसीबीची टीम प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेली नाही. ज्यावेळी 10 टीम आयपीएल खेळल्या होत्या तेव्हा 16 गुणांसह टीम प्लेऑफमध्ये पोहोचली होती. 

आरसीबीने आगामी सर्व सामने जिंकले तर...

या क्षणाला जर रॉयल चॅलेंजर बंगळूरूने उर्वरित 8 सामने जिंकले तर त्यांचे पॉईंट्स 18 होणार आहेत. आठ सामन्यांत 16 पॉईंट्स आणि आधीचे दोन पॉईंट्स आहेत. जर टीम आणखी एक सामना गमावला तर तो जास्तीत जास्त 16 गुणांपर्यंतच पोहोचू शकेल. त्या स्थितीतही टीमला प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी असणार आहे. 

मात्र दुसरीकडे टीमने उरलेल्या 8 पैकी 2 सामने गमावले, तर प्लेऑफ गाठण्याची शक्यता कमी होऊ शकते. त्यानंतर टीमचे जास्तीत जास्त 14 पॉईंट्स असू शकतात. जरी कोणी 14 गुणांसह प्लेऑफमध्ये पोहोचू शकतो, परंतु नंतर नेट रन रेटच्या हिशोबाने प्लेऑफचं समीकरण बदलणार आहे. 

आरसीबीचं नेट रनरेटमध्ये मोठं नुकसान

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर बंगळूरूच्या टीमला 7 विकेट्सनीच पराभव स्विकारावा लागला. यावेळी पहिल्यांदा फलंदाजी करताना आरसीबीने 20 ओव्हर्समध्ये 196 रन्स केले होते. मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी केवळ 15.3 ओव्हर्समध्ये 199 रन्स करून सामना जिंकला. या पराभवानंतर आरसीबीची रनरेटमध्येही मोठी घसरण आहे. आरसीबीला त्यांचे पुढील काही सामने केवळ जिंकावे लागणार नाहीत, तर मोठ्या फरकाने जिंकावे लागतील.