श्री शिवाजी मंदिर येथे रंगणार ‘मित्राची गोष्ट’ आणि ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ नाटकांचे प्रयोग

विजय तेंडुलकर लिखित ‘मित्राची गोष्ट’ आणि अभिराम भडकमकर लिखित ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ या दोन नाटकाचे प्रयोग आता श्री शिवाजी मंदिर येथे रंगणार आहेत. 

दिक्षा पाटील | Updated: Jan 29, 2024, 05:57 PM IST
श्री शिवाजी मंदिर येथे रंगणार ‘मित्राची गोष्ट’ आणि ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ नाटकांचे प्रयोग title=
(Photo Credit : PR Handover)

नव्या कलाकारांना घडवत त्यांना उत्तम व्यासपीठ मिळावे या उद्देशाने 'सृजन' ने  एक मिशन सुरू केलं. ‘सृजन द क्रियेशन’ ही फक्त कार्यशाळा नसून एक संस्था आहे.आणि एक सृजनशील संवेदनशील माणसांचे एक जागतिक कुटुंब आहे. ‘आपली स्पर्धा स्वतःशीच करावी’ हा मंत्र प्रत्येकाच्या मनावर  बिंबवत  आजवर  वेगवेगळया  उपक्रमांच्या माध्यमातून सृजन द क्रियेशनच्या कलाकारांनी अनेक स्पर्धांमध्ये जवळपास ३० च्या वर एकांकिका, अनेक दिर्घ अंक, ४० एक शॉर्टफिल्म केल्या आणि पुरस्कार पण मिळवले. त्यातल्याच विजय तेंडुलकर लिखित ‘मित्राची गोष्ट’ आणि अभिराम भडकमकर लिखित ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ या दोन नाटकांचे प्रयोग श्री शिवाजी मंदिर येथे रंगणार आहेत. 

प्रत्येक नवोदित कलाकाराचं श्री शिवाजी मंदिर येथे प्रयोग करायचं स्वप्न असतं. सृजन द क्रियेशनच्या कार्यशाळेतील कलाकारांचं हे स्वप्न पूर्ण होणार आहे. येत्या सोमवारी  ५ फेब्रुवारीला दुपारी ३.३० वाजता ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ ह्या नाटकाचा आणि  मंगळवारी ६ फेब्रुवारीला रात्री ८ वाजता ‘मित्राची गोष्ट’ ह्या नाटकाचा प्रयोग श्री शिवाजी मंदिर दादर येथे होणार आहे. अर्थात हा सगळा घाट कलाकारांनी वर्गणी काढूनच घातला आहे. तेव्हा आपण सर्वांनी ह्या प्रयोगांना येऊन आशीर्वाद , प्रोत्साहन द्यावे ही नम्र विनंती.

तर अशी ही नवोदित कलाकारांना घडवण्याची चळवळ सभासदांच्या वर्गणी मधून जमा झालेल्या रक्कमेवर, सहभागी कलाकारांनी वर्गणी काढून तसेच सृजन द क्रियेशनचे सर्वेसर्वा  अभिनेता - दिग्दर्शक राजेश  देशपांडे  यांच्या प्रयत्नांनी सुरु  आहे. या स्तुत्य प्रयत्नांना बळ देत  नव्या उदयोन्मुख  कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी  अधिकाधिक नाट्यरसिकांनी या  प्रयोगांना उपस्थित राहण्याचे आवाहन राजेश देशपांडे यांनी केले आहे.  

हेही वाचा : 'हा कोणाचं ऐकत नाही, ऐकलं असतं तर...', अरबाजच्या लग्नावर पहिल्यांदाच बोलला सलमान

गेल्या वर्षी राजेश देशपांडे लिखित चलो एक बार फिरसे हे दोन अंकी नाटक राज्य नाट्य स्पर्धेत सादर केले. त्यातल्या वनमाला वेंदे हिला अभिनयाचे पारितोषिक मिळाले.आणि विजय तेंडुलकर लिखित मित्राची गोष्ट ह्या नाटकातल्या अदित गंगाखेडकर ह्याला पण अभिनयाचा पुरस्कार मिळाला. आयपार ह्या प्रतिष्ठित नाट्य अभिवाचन स्पर्धेत सृजन द क्रियेशनचे कलाकार लागोपाठ तीन वर्ष सर्वोत्कृष्ट नाट्य अभिवाचनाच पारितोषिक मिळवत आहेत. ह्या वर्षी आम्ही राज्य नाट्य स्पर्धेत तीन दोन अंकी नाटकं सादर केली, त्यात वीरेंद्र प्रधान लिखित आम्हीं सौ कुमुद प्रभाकर आपटे, ह्या नाटकातल्या नेहा शर्मा हिला अभिनयाचं पारितोषिक मिळालं, विजय तेंडुलकर लिखित मित्राची गोष्ट , ह्या नाटकातल्या ऐश्वर्या परशुरामेला अभिनयाचं पारितोषिक मिळालं आणि अभिराम भडकमकर लिखित ज्याचा त्याचा प्रश्न ह्या नाटकातली सचिन शिंदे ह्याला अभिनयाचं प्रशस्तीपत्रक आणि वनमाला वेंदे हिला रौप्य पदक मिळालं आणि श्याम चव्हाण ह्यांना प्रकाश योजनेचं प्रथम पारितोषिकं मिळालं. बाल राज्य नाट्य स्पर्धेत राजेश देशपांडे यांची इडिया घर ही जॉर्ज ऑर्वेलच्या ॲनिमल फॉर्म वरून प्रेरणा घेऊन लिहिलेली एकांकिका सादर केली. तिच्यात एकूण २५ लहान मुलांनी अभिनय केला. त्यात देवांश खेंगलेला अभिनयाचं प्रशस्ती पत्रक तर उदय तांगडी ह्याला रंगभूषेच द्वितीय पारितोषिक मिळालं.